काँग्रेस, भाजपसह सगळ्यांचाच पराभव करत आठवले गटाचा ‘या’ गावात दणदणीत विजय


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सोमवारी त्याची मतमोजणी पार पडत आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात चुरशीची लढत होत आहे, तर महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यात अनेक ठिकाणी प्रमुख लढती झाल्या. पण अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना अस्मान दाखवले आहे.

रामदास आठवलेंच्या आरपीआयचा अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाले असून 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.