सिंधुदुर्गातील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचीच निर्विवाद सत्ता


सावंतवाडी : आता भाजपचीच निर्विवाद सत्ता सिंधुदुर्गातील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींवर आलेली असून राणे समर्थकांना शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अन्य ग्रामपंचायतीही हिसकावून घेण्यात यश आले आहे. आमदार नितेश राणे यांनी या विजयावर आम्हाला धक्का देणार अजून जन्माला आला नसल्याचा, इशारा शिवसेनेला दिला आहे.

भाजपला सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात यश आहे. भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची दांडेली या गावात सासूरवाडी असून मागील बरीच वर्षे शिवसेनेकडे दांडेली ग्रामपंचायत होती, पण ती ग्रामपंचायत यावेळी भाजपकडे आली आहे. भाजप नेते आशिष शेलार स्वतः या ठिकाणी प्रचारासाठी आल्यामुळेच या ग्रामपंचायतीवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

देवगड तालुक्यातील 23 पैकी 18, वैभववाडी 12 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. यावेळी भाजपने शिवसेनेकडे असलेल्या तोंडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, कोलगाव ग्रामपंचायती मिळविल्या आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत दहा वर्षेनंतर भाजपकडून हिसकावून घेण्यात शिवसेनेला यश आले आहे माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्ह्य़ात कोलगाव प्रमाणेच तळवडे ग्रामपंचायत महत्वाची मानली जात होती.पण ही सत्ता खेचून आणण्यात शिवसेनेला यश आले असून शिवसेना आठ तर भाजपला पाच जागावर यश मिळाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायत शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोलगावकडे पाहिले जात होते. भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे.