मोबाईल नंबरवर कॉल करण्याच्या नियमात आजपासून होत आहे मोठा बदल


नवी दिल्ली – देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात आजपासून महत्त्वाचा बदल होत आहे. लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी ‘ट्राय’च्या आदेशानुसार मोबाईल नंबरआधी शून्य (0) डायल करावा लागेल. आजपासून ‘ट्राय’चा हा नवा आदेश लागू होत आहे.

याबाबत दूरसंचार विभागाला ट्रायने 29 मे 2020 रोजी शिफारस केली होती. त्यानंतर दूरसंचार विभागाने गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर रोजी ट्रायची शिफारस स्वीकारताना आवश्यक बदल करण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले होते. ही नवीन व्यवस्था स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक दूरसंचार कंपन्यांना विभागाकडून जारी करण्यात आले होते. या नवीन बदलामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. डायल करण्याची पद्धत बदलल्यावर दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी अतिरिक्त नंबर निर्माण करता येतील.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीने शून्य न लावता लँडलाइनवरुन मोबाईल नंबरवर फोन लावल्यास त्याला पहिले शून्य डायल करण्यास आजपासून सांगितले जाईल. दरम्यान, टेलिकॉम कंपन्या भविष्यात 11 अंकी मोबाइल नंबरही जारी करु शकतात. देशात सध्या मोबाईल ग्राहकांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे 10 अंकी मोबाईल नंबर कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.