कृषी कायदा विरोधात अण्णा हजारे करणार आयुष्यातील शेवटचे उपोषण

फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स

केंद्राने नव्याने लागू केलेल्या कृषी कायदे विरोधात किसान आंदोलन जारी असतानाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात आघाडी उघडली आहे. अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कृषी कायदे विरोधात मागण्या मान्य न केल्यास आयुष्यातील शेवटचे आमरण उपोषण जानेवारी अखेर सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.

अण्णा म्हणाले या मुद्द्यावर केंद्राशी पाच वेळा पत्रव्यवहार केला पण एकाही प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. दिल्ली येथे रामलीला मैदानावर उपोषण करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना चार पत्रे लिहिली त्याचेही उत्तर नाही. मागच्या वेळी रामलीला मैदानावर उपोषण केले तेव्हा तत्कालीन युपीए सरकारला संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे लागले होते असा इशारा अण्णांनी दिला आहे.

अण्णा म्हणाले गेल्या वेळी रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन पुकारून आमरण उपोषण केले होते तेव्हा मोदी यांचे वरिष्ठ मंत्री केंद्रात विरोधी पक्ष म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी आमच्या उपोषणाची प्रशंसा केली होती आता मात्र लिखित स्वरुपात आश्वासन द्यायचे मान्य करूनही ते पूर्ण केले गेलेले नाही. डिसेंबर मध्ये अण्णांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनाही पत्र लिहिले होते आता त्यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

राळेगण सिद्धी या आपल्या गावी अण्णा स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारसी लागू कराव्यात म्हणून फेब्रुवारी २०१९ पासून दीर्घकाळ आंदोलन करत आहेत. या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन अण्णांना दिले गेले होते असे त्यांचे म्हणणे आहे.