धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केले पहिल्यांदाच भाष्य


सांगली – सध्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे चर्चेत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली असून सहमतीने संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि धनंजय मुंडे यांचे जीवलग मित्र अमोल कोल्हे यांनी या सर्व घडामोडींवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

सांगलीतील म्हैसाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे आले होते. त्यांनी यावेळी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना सुनावले आहे. जेवढया नैतिकतेची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का?, अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, आता स्वतःला विरोधकांनी आरशात पाहिले पाहिजे. जर त्यांनी आरशात पाहिले तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असे वाटत नाही. धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिले असून तेच यावर अधिक बोलतील, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुनही अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला. ज्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवले, महाराजाच्या गड किल्ल्यांवर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून ज्यांनी जीआर काढला.. हे लोक आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का?, असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी पाच वर्ष सत्ता असताना नेमके काय केले, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.