आरोप झाले म्हणून काय धनंजय मुंडेंना फासावर चढवायचे का? – अनिल परब


मुंबई : एखाद्या व्यक्तीने फक्त आरोप केले म्हणजे कारवाई होत नसते. कायद्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होईल. त्यानंतर कायदेशीर निर्णय घेतला जाईल. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले म्हणजे त्यांना लगेच फासावर चढवायचे का?, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री अनिल परब यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर दिली आहे. परब यांनी यावेळी बोलताना सर्व गोष्टी कायदेशीररित्या होतील, असे सांगितले.

एखाद्या व्यक्तीने आरोप केले म्हणजे त्यावर तातडीची कारवाई होत नाही. आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप त्यांनी केले आहेत; त्याची चौकशी होईल. या सर्व गोष्टीसाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच सर्व गोष्टी होतील, असे परब म्हणाले. तसेच जे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाले आहेत त्यावर मुंडे यांनी खुलासा करत स्पष्टीकरण दिलेले आहे. खुलासेवार या सर्व गोष्टींची चौकशी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असेही अनिल परब म्हणाले.

मुंडे यांच्या राजीनाम्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागणी केली होती. यावर बोलताना सगळ्या गोष्टी कायदेशीर मार्गाने होतील, असे परब यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांचा तक्रार करणे धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची हा एकाप्रकारे कुणावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणू देत, सत्य बाहेर येऊ देत. त्यांनतरच काय तो निर्णय होईल, असे अनिल परब म्हणाले.