नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडल्यास तुम्हाला पडेल महागात


नवी दिल्ली – एखाद्या कंपनीत जर तुम्ही कार्यरत असाल आणि तुम्ही पहिली कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर कंपनीने ठरवून दिलेल्या निर्धारित नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडण्याची तयारी करत असाल तर ते तुम्हाला महाग पडू शकते. जर नोकरी सोडण्यापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या कंपनीत नोटीस परिअड पूर्ण न करता नोकरी सोडली तर त्याला आता १८ टक्के वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी भरावा लागू शकतो. यासंबंधी एक महत्त्वपूर्ण निकाल गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगनं दिला आहे. त्यांनी या निकालात नोटीस पिरिअड पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रिकव्हरी म्हणून १८ टक्के जीएसटी वसूल करण्यास सांगितले आहे.

तीन महिन्यांचा नोटीस पिरिअड न देता अहमदाबादमधील एक निर्यात कंपनी एम्नेल फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. ऑथोरिटीसमोर या प्रकरणातील सुनावणी करण्यात आली. आपल्या अनेक उत्पादनांची ही कंपनी निर्यात करते. अनेक कंपन्यांचे नोटीस पिरिअडबाबत निरनिराळे नियम असतात. अनेक ठिकाणी १ महिन्यांपासून तीन महिन्यांपर्यंतचा नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागतो. तीन महिन्यांचा नोटीस पिरिअड एम्नेल फार्मास्युटिकल्समध्ये आहे.

सदर कर्मचाऱ्याला एन्ट्री ऑफ सर्व्हिसेसअंतर्गत १८ टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याचे अथॉरिटीने आपल्या निर्णयात सांगितले. नोटीसच्या कालावधीत दिल्या जाणाऱ्या पैशांच्या रिकव्हरीवर हा जीएसटी लागू होणार आहे. जो करार कर्मचारी आणि कंपनीच्या दरम्यान होणार आहे, नोटीस पिरिअडमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना यासाठी ही रक्कम द्यावी लागणार आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याला नोटीसच्या कालावधीच्या उल्लंघनाच्या बदल्यात ही रक्कम द्यावी लागणार आहे.