पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण


मुंबई – धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिक यांच्या जावयावरील अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशाची चर्चा अशा अनेक मुद्द्यांवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरही भाष्य केले.

पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे राजीनामे घेतले जाणार का? असे त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोणीतरी आरोप केला म्हणून राजीनामा देणे ही बाब होणार नाही. पण पक्ष स्तरावर या बाबतीत आम्ही योग्य ती चर्चा करणार आहोत. आपली भूमिका धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली. जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु.

नवाब मलिक यांच्याबाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केली आहे की नाही ते माहिती नाही, चौकशीदरम्यान ते कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचे काही कारण नाही. सरकार कोणताही हस्तक्षेप या दोन्ही प्रकरणात करत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.दरम्यान जयंत पाटील यांना यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आली नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी उत्तर देणे टाळले.