महिला नेत्यांना पुरुष नेत्याशी संपर्क असला तरच मिळते उमेदवारीचे तिकीट – रेखा शर्मा


हैदराबाद – महिला नेत्यांना पुरुष नेत्याशी संपर्क असला तरच उमेदवारीचे तिकीट मिळते असे वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केले आहे. रेखा शर्मा या मौलाना आजाद नॅशनल उर्दु महाविद्यालयाने महिला शिबिराचे आयोजन केले होते, यावेळी महिलांचा सहभाग यावर त्या बोलत होत्या. रेखा शर्मा या वेबिनारच्या माध्यमातून आयोजनात सहभागी झाल्या होत्या.

रेखा शर्मा यावेळी म्हणाल्या की, संसदेत आणि विधिमंडळात महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील. देशात अशा काही महिला आहेत ज्यांच्याकडे चांगले मंत्रालय आहे, पण त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. महिलांना राजकीय पक्ष तिकीट देऊ इच्छित नाही, कारण त्यांना वाटते ही महिला निवडणूक हरू शकते, असे त्यांनी सांगितले.

तसेच तिकीट अशा व्यक्तींना दिले जाते, ज्यांची समाजात प्रतिमा खराब आहे. अशा व्यक्तींवर आरोप आहेत, पण राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देणार नाहीत. त्याचबरोबर जर कोणत्या महिलेला तिकीट मिळत असेल तर तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असावा लागतो. म्हणजे चेहरा महिलेचा आणि काम कोणी दुसरे करेल असे राजकारण करणाऱ्यांवर रेखा शर्मा यांनी जोरदार निशाणा साधला.