नेपाळमधील राजकारण तापले असतानाच के. पी. ओली यांचे महत्वाचे वक्तव्य


काठमांडू – कार्यकारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भूमिका नेपाळमधील राजकीय गोंधळादरम्यान दिवसोंदिवस मवाळ होताना दिसत आहे. जिनपिंग सरकारला चीनचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या ओली यांनी थेट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये चीनने ढवळाढवळ करु नये. भारत आणि नेपाळ हे चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. स्वत:चे स्वातंत्र्य नेपाळला प्रिय असून इतर देशांचे आदेश आम्ही मानणार नसल्याचेही ओली यांनी म्हटले आहे. भारताचे कौतुक करताना आमच्यामध्ये कोणताही तिसरा देश येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक असून दोन्ही देशांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नसल्याचा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला आहे.

झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओली यांनी आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेत असल्याचे म्हटले आहे. नेपाळ आणि भारताचे खूप चांगले संबंध असल्याचेही ओली यांनी अधोरेखित केले आहे. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न ओली करत आहे. याच मुलाखतीमध्ये ओली यांनी नेपाळच्या जनतेला संदेश देताना नेपाळच्या हितापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त महत्वाची नसल्याचे म्हटले आहे.

भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत भारताकडून कोरोना लसीचा पुरवठा होईल हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरु आहे. ओली यांनी भारतासोबत सुधारलेले संबंध आणि कोरोना लसीच्या जोरावर पुन्हा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची रणनीती आखल्याचे राजकीय जाणकार सांगतात. नेपाळमध्ये सध्या सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याने ओली यांचे हे वक्तव्य एक नियोजित धोरणांनुसार केलेले वक्तव्य असून नेपाळला सध्या भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे असल्याचे सांगितले.

आपण भारतासोबत असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. नेपाळमध्ये निवडणुकीची घोषणा झाली असून सध्या पाठिंब्याची ओली यांना गरज आहे. नेपाळमधील भारताचे माजी राजदूत असणाऱ्या लोकराज बरल यांनी ओलींच्या या वक्तव्याचा अर्थ दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे हे दाखवणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

१४ जानेवारी रोजी नेपाळचे परराष्ट्र मंत्री आणि ओली यांचे निकटवर्तीय असणारे प्रदीप ज्ञवली हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. ओली यांनी याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारसोबत ज्ञवली हे कोरोना लसीसंदर्भात चर्चा करणार आहेत. कोरोना लसीच्या विषयाबरोबरच नेपाळमधील राजकीय संघर्ष आणि भारताची यासंदर्भातील भूमिका याबद्दलची भारतीय नेतृत्वाशी ज्ञवली हे चर्चा करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेपाळमधील संसद बरखास्त करण्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, हा नेपाळचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने म्हटले होते.

ओली यांनी विनो या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचा उल्लेख केला आहे. चीन किंवा भारताच्या प्रदेशावर आम्ही दावा करण्याच्या परिस्थितीत नसलो तरी आमच्या भूप्रदेशावर आम्ही नक्कीच दावा करणार. मला वाटते २०२१ हे असे वर्ष असेल की जेव्हा आम्ही भारत आणि नेपाळमध्ये कोणताच वाद नसल्याची घोषणा करु, असा विश्वासही ओली यांनी व्यक्त केला.

भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या वादावर तोडगा काढण्याची गरज असल्याचेही ओली यांनी म्हटले आहे. या दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी आम्ही मदत करु शकलो तर त्यासाठी आम्ही तयार असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. ओली यांच्या कार्यकाळात नेपाळने जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये भारत नेपाळ सीमेवरील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते. तर दुसरीकडे चीनने हुमला येथे नेपाळच्या सीमेजवळचा बराच मोठा भाग बळकावला. आमच्या स्वातंत्र्याबद्दल आणि सर्वभौमत्वासंदर्भात आम्ही कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे ओली यांनी म्हटले आहे.