आंदोलकांपैकी अनेकजण हे मोठे व्यापारी असल्याचा भाजप खासदाराचा दावा


नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारे उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी कृषि विधेयकांविरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना खरे शेतकरी तर शेतात राबत असल्याचे म्हटले आहे. साक्षी महाराज यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिशाभूल झालेले शेतकरी असे म्हटले आहे. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांपैकी अनेकजण हे शेतकरी नसून मोठे व्यापारी असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

खरे शेतकरी हे शेतात राबत असल्याचे म्हणत साक्षी महाराज यांनी कृषि विधेयकांनाविरोध करणाऱ्या आंदोलनावर टीका केली. खरे शेतकरी जर तुम्हाला पहायचे असेल तर मुराबादामधील शेतकरी संम्मलेनात चला, तुम्हाला खरे शेतकरी मी दाखवतो, असे साक्षी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. आंदोलकांपैकी अनेकजण हे मोठे व्यापारी असल्याचा दावाही त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांपैकी काही ५०० बिगा जमिनीचे मालक आहेत तर काही हजार बिगा जमिनीचे. अशाच लोकांच्या पोटात नवीन कृषि विधेयकांमुळे पोटशूळ उठला आहे.

सर्व देशामध्ये केवळ दोन ते तीन ठिकाणी आंदोलन सुरु असून सिंघू बॉर्डरवर पंजाबमधून लोके येत आहेत. दिल्लीच्या सीमांवर हरयाणा आणि राजस्थानमधूनही शेतकरी आले आहेत कारण काँग्रेसचे सरकार दोन्ही राज्यांमध्ये असल्याचेही साक्षी महाराज म्हणाले. साक्षी महाराज यांनी पुढे बोलताना हा विरोध कृषि विधेयकांना केला जात नसून निशाणा एकीकडे असला तरी हेतू काही वेगळाच आहे. खरे दु:ख सीएए आणि एनआरसीचे आहे. जो त्रास अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे झाला आणि अयोध्येमध्ये प्रभु श्री रामांचे जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा खरा त्रास असल्याचे म्हटले आहे. साक्षी महाराज यांनी खिसियानी बिल्ली खंभा नोच रही है या हिंदी म्हणीचा वापर करत उगाच आपला राग शांत करण्यासाठी आरडाओरड केला जात असल्याचा टोलाही लगावला आहे.

साक्षी महाराज यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. अखिलेश यादव हे सुशिक्षित व्यक्ती असून त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. पण ते सध्या संभ्रमावस्थेत दिसत असल्याचे मत साक्षी महाराजांनी व्यक्त केले. अखिलेश हे कधी राम भक्त असल्याचे दाखवतात तर कधी राम विरोधी असल्याचे जाहीर प्रदर्शन करतात. योग्य मार्गावर ते चालू शकत नाही. पण योग्य मार्गावर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. चांगला मार्ग हा कल्याणकारी मार्ग असतो, असा टोला साक्षी महाराजांनी अखिलेश यांना लगावला आहे.