भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी


मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेने केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, आता या प्रकरणावरून भाजप आक्रमक होताना दिसत आहे. भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पोलिसांत धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यानंतर सविस्तर खुलासा करत सहमतीने संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा या महिलेने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून कबूल केले आहे की, करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती.

सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर मी दोन्ही मुलांना माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून, स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी, अशी मागणी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी असल्याचे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करत असल्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.