आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा


मुंबई – पुन्हा एकदा शिवसेनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला शिवसेना दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांच्याकडून बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर त्याचबरोबर आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

भाजपची ही मंडळी ज्या पद्दतीने अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागद फडकावतात आणि आरोप करतात. त्यांनी प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसेच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केले. हिंमत असेल तर हे आरोप सिद्ध त्यांनी करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही, तर या आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारले नाही तर माझे नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितले असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

आम्ही राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना खूप काळजीपूर्वक काम केले. आमच्यावर तुमच्यासारख्या फडतूस लोकांनी आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नसल्याचेही संजय राऊत यांनी सुनावले.

ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची असून कायद्याच्या पलीकडे जाऊन जे भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? या व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे पक्षाने सांगावे. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्यातील नेत्यांच्या सुरक्षे कपात कमी करण्यात कोणतेही राजकारण नसून आमच्याही सुरक्षा याआधी काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. आम्ही मागच्या वेळी सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेतली होती, पण एका शब्दाने मी तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, ज्यामध्ये महत्वाच्या लोकांचा समावेश असतो आणि ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचे सरकार जागरुक आणि संवेदनशील असून विरोधकांच्या जीवाशी खेळावे किंवा सूडबुद्दीने वागावे, असा ट्रेण्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे, असे कोणीही म्हणू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद आहे. तिथे विदर्भातील नाना पटोले अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद बदलले जात असून जी काही नावे आहेत, त्यात नाना पटोलेंचे नाव असल्याचे मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी या घडामोडी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील आहेत. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच प्रदीर्घ काळ हे तीन पक्षांचे सरकार चालणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.