या मंदिरांमध्ये आहेत जगावेगळ्या परंपरा


भारतातील अनेक मंदिरांच्या स्वतःच्या अश्या काही खास परंपरा आहेत. पूजे-अर्चेशी, किंवा मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या काही खास विधींशी या परंपरा निगडित असतात. पण काही मंदिरांमधील परंपरा अगदीच हटके म्हणाव्या लागतील. किंबहुना या परंपरांच्या मुळेच ही मंदिरे प्रसिद्ध झाली असून, भाविक मुद्दाम या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात.

राजस्थान येथील मेहेंदीपूर बालाजीचे मंदिर अगदी खास आहे. येथे तथाकथित ‘झपाटलेल्या’ व्यक्तींना, त्यांच्यावरील नकारत्मक शक्तीचा प्रभाव हटविण्याच्या उद्देशाने आणले जाते. अंगातून ‘भूत’ काढण्यासाठी त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्यांचे डोके भिंतींवर आदळणे, त्यांना साखळदंडानी बाधून ठेवणे, त्यांच्या अंगावर उकळते पाणी ओतणे, अश्या प्रकारचे अघोरी म्हणावेत, अश्या प्रकारचे उपाय केले जात असतात. या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना कोणताही प्रसाद दिला जात नाही. तसेच मंदिरातून माघारी जाताना मंदिराकडे कोणीही मागे वळून पाहू नये असा येथील प्रघात आहे.

सर्वात प्राचीन शक्तीपीठांमध्ये आसामच्या देवी मंदिराचा देखील समावेश आहे, हे मंदिर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तीन दिवस बंद ठेवले जाते. त्यावेळी देवीला मासिक धर्म सुरु असतो अशी येथील लोकांची मान्यता आहे. त्यावेळी मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी लाल होते असे मानले जाते. या वेळी दर्शनाला येणारे भाविक देवीला प्रसाद म्हणून लाल रंगाचा कपडा दान देतात.

राजस्थान येथील ओम बन्ना मंदिराला ‘बुलेट बाबा मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. या मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती नसून ओम सिंह राठोड नामक मृत व्यक्तीची मोटरसायकल आहे. १९८८ साली ओम सिंहचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्याची मोटरसायकल पोलिसांनी पंचनाम्यासाठी जप्त केली होती. पण ही मोटरसायकल आपोपाप ज्या ठिकाणी अपघात झाला, तिथे जाऊन उभी राहिली. पोलिसांनी ही मोटरसायकल पुन्हा पोलीस स्टेशनला आणली असता, ती पुन्हा अपघातस्थळी जाऊन उभी राहिली. असे अनकेदा घडल्यानंतर हा दैवी चमत्कार आहे समजून जिथे मोटरसायकल उभी होती, तिथे गावकऱ्यांनी मंदिर बनविले. आजही घरामध्ये नवे वाहन आले, की वाहन आणि ते चालविणारा सुरक्षित राहावा यासाठी अनेक भाविक आवर्जून बुलेट बाबाच्या दर्शनाला येत असतात.

उजैन येथील कालभैरव मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मद्य दिले जाण्याची परंपरा आहे. देवालाही प्रसाद म्हणून मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. हे मद्य देवाच्या मूर्तीच्या मुखामध्ये अर्पण केले जाते. बहुतेक सर्वच मंदिरांच्या बाहेर ज्याप्रमाणे फुलाच्या हारांची किंवा प्रसादाची दुकाने असतात, त्याप्रमाणे या मंदिराच्या बाहेर मद्याची दुकाने आहेत. केरळ येथील कोडंगलूर भगवती मंदिरामध्ये ‘भरणी’ उत्सवामध्ये भाविक लाल रंगाची वस्त्रे परिधान करतात, आणि स्वतःच्या शरीरावर तलवारींनी आघात करून घेण्याची प्रथा आहे. हा उत्सव सात दिवस सुरु राहतो.

Leave a Comment