भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिले ४०७ धावांचे आव्हान


सिडनी – ऑस्ट्रेलियाने भारताला बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षण करत झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. स्मिथ, ग्रीन आणि लाबुशेन यांना भारतीय खेळाडूंनी जीवनदान दिल्यामुळे भारतासमोर डोंगराएवढे आव्हान ऑस्ट्रेलियाने ठेवले आहे.

भारताला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात रविंद्र जाडेजाची कमी जाणवत होती. जाडेजाच्या बोटाला पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखपत झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकणार असल्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाही भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी दीड दिवस ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघ कशी फलंदाजी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कांगारुंनी सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर वर्चस्व मिळवले होतेच. त्यांनी आज चौथ्या दिवशी सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे. काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी सकाळच्या सत्रात अर्धशतके झळकावून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली. कॅमरुन ग्रीन (८४), स्मिथ (८१) आणि लाबुशेन (७३) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहा गड्यांच्या मोबदल्यात ३१२ धावा चोपल्या. भारताकडून सैनी आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन – दोन बळी घेतले. तर सिराज आणि अश्विनला प्रत्येकी एक-एक बळी मिळवता आला.