नामांतराच्या मुद्द्यावर संजय राऊत भडकले


नाशिक : सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्दयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आला. यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने, लोकभावनेवर चालते, असे नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

राऊत पुढे म्हणाले, जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली ती योग्य असून सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालते आणि संभाजी महाराजांचे नाव सरकारने वापरणे हा गुन्हा आहे का? सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे नाव वापरणे हा गुन्हा आहे, असे मला वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालते

राऊत यांना प्रश्न विचारताना पत्रकारांनी सरकारी ट्विटरवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर असे वापरण्यात आले आहे. यावर शिवसेनेने सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचे असेल ते सामनामध्ये लिहावे असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले.