गांधी कुटुंबियांची राऊतांकडून पाठराखण; केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम दिला जात आहे त्रास


मुंबई – देशातील केंद्रीय तपास यंत्रणांकडून गांधी कुटुंबीय आणि विरोधकांना मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत बोलणे ही काही आपली संस्कृती नाही. गांधी कुटुंबियांना आणि विरोधकांना गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले.

विरोधकांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दामहून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आम्ही सुद्धा असून गांधी कुटुंबिय देखील त्यात आले. पण कुणी कितीही प्रयत्न केला तरी काहीच साध्य होणार नाही. विरोधीपक्ष आगामी काळात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेईल हा आपला आजवरचा इतिहास राहीला असल्याचेही राऊत म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात कौतुक करण्यात आले आहे. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींचे भय वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. त्या शंभर पटीतील राहुल गांधींचे भय असल्याचे म्हणत ‘सामना’तून राहुल यांचे कौतुक करण्यात आले आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी अध्यक्ष होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही, हे सत्य स्वीकारावे लागेल. गांधी काही काळासाठी दूर जातच पक्ष होता, त्यापेक्षा जास्तच खाली घसरल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.