उद्या मलाही येऊ शकते ईडीची नोटीस – रोहित पवार


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या माध्यमातून भाजप विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. आज पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रोहित पवार पोहोचले होते. त्यांनी यावेळी माथाडी कामगार तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारवर कृषी कायदा केंद्र सरकारने लादला असला, तरी शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले.

पहाटे चार वाजता हे मार्केटच उघडते त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसे चालते, याच्यात काय अडचणी आहेत तसेच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो असल्याची माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली.

आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. आम्ही तेव्हा त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडी समीरकरण महानगरपालिकांमध्ये योग्य पद्धतीने बसू शकते. पण तो शेवटी वाटाघाटीचा भाग असतो. पण तुम्ही काही प्रमाणात पदवीधर आणि विधान परिषद निवडणुका पाहिल्या तर एका ठराविक विचारधारेच्या विरोधात लोकेही आहेत आणि महाविकास आघाडी सरकारही आहे. एकत्रित ताकद मोठी आहे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिल्यामुळे येथेही भाजपच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण हे शेवटी नेते ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले.

दरम्यान रोहित पवार महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या चौकशीबद्दल म्हणाले की, भाजपच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना ईडीच्या नोटीशी आल्या आहेत. नोटीस भाजपच्या विरोधकांना आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की कशा पद्धतीने ईडीचा वापर होत आहे. उद्या कदाचित मला देखील ईडीची नोटीस येईल. आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचे सर्वसामान्यांच्या सुद्धा लक्षात आले आहे. एवढी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.