एखाद्याच्या खात्यातून हॅकर्सने पैसे गायब केल्यास त्याला बँक असेल जबाबदार


नवी दिल्ली – राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली आणि त्यात ग्राहकाचा हलगर्जीपणा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. क्रेडिट कार्डामुळे एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात बँक व्यवस्थापनाला आयाेगाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी जबाबदार धरले आहे.

आयाेगाने एचडीएफसी बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत पीडित महिलेला ६,११० डाॅलरची (अंदाजे ४.४६ लाख रुपये) रक्कम १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पीडितेला मानसिक छळ केल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून आणखी ४० हजार रुपये आणि केस खर्चासाठी ५,००० रुपये देण्याचे आदेश आयोगाने बँक व्यवस्थापनाला दिले आहेत. निर्णय देताना न्या. सी. विश्वनाथ म्हणाले की, क्रेडिट कार्ड इतर कुणी पीडितेचे चोरले आहे, याचा पुरावा बँक सादर करू शकली नाही. हॅकरने आपल्या खात्यातून पैसे काढले आहेत आणि बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत त्रुटी असल्याचा दावा या महिलेने केला आहे.

ठाण्यातील एचडीएफसी बँकेकडून आपली लाॅस एंजलिसमध्ये राहणारी मुलगी जेसिना जाेससाठी एक प्री-पेड फाॅरेक्स प्लस डेबिट कार्ड २००७ मध्ये घेतले हाेते. बँकेने जेसिकाच्या वडिलांकडून १९ डिसेंबर २००८ रोजी ३१० डॉलर्सची रक्कम काढल्याबद्दल हमी मागितली. बँकेला असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे वडिलांनी सांगितले. बँकेने दुसऱ्याच दिवशी १४ ते २० डिसेंबरदरम्यान ६ हजार डॉलर्सची रक्कम काढल्याचे सांगितले.

सर्वाेच्च न्यायालयाने पूर्वीच्या निर्णयाचा हवाला देताना या निर्णयामध्ये नमूद केले की एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून (खातेदार वगळता) बेकायदेशीररीत्या पैसे काढले तर त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येऊ शकते का हा मूळ प्रश्न आहे. याचे उत्तर हाे आहे. एखाद्याचे खाते जर बँक उघडत असेल तर त्या व्यक्तीच्या पैशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी बँकेची आहे. काेणत्याही प्रणालीत बिघाड झाला, मग ताे त्यांच्याकडून असेल वा अन्य प्रकारे (खातेधारक साेडून) तर त्यासाठी ग्राहक नाही, तर बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. म्हणूनच सध्याच्या प्रकरणातही अवैधपणे पैसे महिलेच्या खात्यातून काढून घेणे आणि फसवणुकीच्या बाबतीत बँकेला ग्राहकांचे नुकसान भरून द्यावे लागेल.