सपाच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना केले महाराष्ट्राचेच नाव बदलण्याचे आवाहन


मुंबई – औरंगाबाद महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पुन्हा एकदा पडली आहे. आता महाराष्ट्रभर नामांतराचा हा वणवा पसरताना दिसत आहे. तसेच औरंगाबादबरोबरच राज्यातील अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. सपाच्या नेत्याने नामांतराच्या या मागण्यांवर भूमिका मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचेच नाव बदलण्याचे आवाहन केले आहे.

भाजपने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्येच यावरून मतभेद असून, या मुद्द्यावर भाजपकडून सातत्याने जोर दिला जात असल्याचे दिसत आहे.

शहरांची नावे बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानेही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सपा नेते व आमदार अबू आझमी यांनी आवाहन केले आहे. शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचे नाव ठेवायचेच असेल, तर नवी शहरे वसवून ठेवा.

अहमदनगर किंवा औरंगाबादला स्वतःचा असा एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणे योग्य नाही. नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. राज्यातील लोकांनाही ते आवडेल. पण केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे हे आपल्याला शोभत नसल्याचे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.

जगभरातून तसेच देशभरातून महाराष्ट्रात लोक येत असतात. राज्याला तुम्ही पुढे घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. तुमचे कौतुक लोक नक्कीच करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे काम करू नका. आपल्यासारख्याला ते शोभत नसल्याचे आझमी यांनी म्हटले आहे.