शेतकरी आंदोलनावरुन सचिन पायलट यांची आरएसएस आणि भाजपवर सडकून टीका


जयपूर : जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणे हा खरा राष्ट्रवाद असून नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणे देणे हा राष्ट्रवाद नसल्याचे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपवर टीका केली.

सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ते म्हणाले, तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा जर करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणे देणे हा राष्ट्रवाद नसून शेतकऱ्यांचे भविष्य भाजप अंधारात ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पायलट भाजपवर टीका करताना म्हणाले, तुम्ही आत्ताच्या काळात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहात. इतिहास साक्षी आहे, देशातील बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर इतर पक्षाचे काही मोजकेच होते. भाजपमध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचे वाईट वाटते की देशातील शेतकरी सध्या केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे.

शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हा म्हणावा तेवढा क्लिष्ट नाही की केंद्र सरकार तो सोडवू शकत नाही. तुम्हाला फक्त एवढेच सांगायचे आहे की आम्ही यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) अंतर्भाव करतो आहोत आणि तिन्ही कायदे मागे घेत आहोत. केंद्राने हे समजून घ्यायला हवे की काही कायदे मागे घेतल्याने कुठलेही नुकसान होणार नाही. केंद्र सरकारने जर कायदे मागे घेतले, तर आम्ही त्यांचे आभार मानू. पण हे कायदे ते मागे घेणार नाहीत कारण ते हटवादी आहेत. कायद्यात सुधारणा करणे, ते मागे घेणे किंवा माफी मागणे ही मोठी गोष्ट असल्यामुळे नेत्यांची उंची वाढते, ही लाज वाटण्याची बाब नाही.

पायलट केंद्रावर टीका करताना म्हणाले, आपल्या हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना नक्षलवादी, माओवादी, विभाजनवादी आणि दहशतवादी संबोधले जात आहे. त्यांना ही संबोधने केली जात आहेत कारण केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांचा एकही नेता नाही, शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत जो विचार करेल. शेतकऱ्यांसोबत उभे राहणे हे जर राजकारण असेल तर आम्ही ते करत आहोत. शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे आणि कायम पाठिंबा राहिल.