जोपर्यंत आपली भूमिका मनसे बदलत नाही, तोपर्यंत युती नाही – चंद्रकांत पाटील


पुणे – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल राजकीय वर्तुळातही बोलले जात आहे. पण यावर अद्याप दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली नव्हती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अखेर मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार का? या दीर्घकाळापासून चघळल्या जात असलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. त्याचबरोबर युतीसाठी एक अटही घातली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, याबद्दलची भूमिका मी वारंवार मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेले आहे. एक वाक्य मी दरवेळी म्हटले आहे की, परप्रांतीयांबद्दलची भूमिका मनसे जोपर्यंत बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका, असे म्हटलेले नाही. ८० टक्के नोकऱ्या स्थानिक लोकांना द्या, असा कायदाच असल्यामुळे नव्याने भांडण्याचे कारण नाही. कायदाच आहे. शेवटी मनसेचा कशाला विरोध आहे?

परप्रांतियांच्या टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातील सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. लाख लाख मराठी जबलपूर, इंदौर सारख्या शहरात आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणे तोही संघर्ष करणे आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष असून राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण ते जोपर्यंत परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असे चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. अजून तरी युतीबद्दल विषय आलेला नाही. वारंवार तुमच्या माध्यमातूनच मी मांडत आहे. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.