पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ, उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक


मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस दक्ष राहून काम करतात म्हणून आपण सण साजरे करू शकतो. या जाणिवेतून मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून पोलिसांचे आभार मानायला आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांची बदनामी करण्याचा मध्यंतरी काही लोकांनी प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडे बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. १०० ते १५० वर्षांची ही परंपरा असल्यामुळेच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला हाणला.

अनेक जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात. तणावात त्यांचा प्रत्येक क्षण जातो. काही पोलीस कोरोनाच्या काळात शहीद झाले. कोरोनाने काही हजार पोलिसांना ग्रासले. पण तरी देखील पोलीस दल काम करत राहिले. त्यांना कुटुंब नव्हते का? पोलिसांनी तेव्हा जर ‘वर्क फ्रॉम होम’ केले असते तर काय झाले असते?, असा सवाल विरोधकांना करत, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. अजूनही कोरोनाचं संकट गेलेले नाही. इतर देशांमध्ये हा धोका आणखी वाढला असल्यामुळे जर सर्व उघडले तर ते चुकीचे ठरेल. पोलिसांवरही विनाकारण ताण येईल, असेही त्यांनी म्हटले.