४ मेपासून ‘सीबीएसई’ दहावी आणि बारावीच्या परीक्षा


नवी दिल्ली – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केल्या असून ४ मेपासून लेखी परीक्षा तर १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये सुरू होते. पण, वेळापत्रक यंदा जानेवारी उजाडेपर्यंत जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ होते. अखेर सीबीएसईच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली. परीक्षांच्या तारखा गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

निकाल जुलैमध्ये जाहीर झाल्यावर पुढील वर्षीच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. दरवर्षी मे अखेरीपर्यंत निकाल आणि जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे पुढील शैक्षणिक वर्षही लांबणार आहे. यंदा चार वेळा जेईई घेण्याचा निर्णय राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. त्यानुसार चार संधी फेब्रुवारी ते मे या कालावधीत देण्यात येतील. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा आणि सीबीएसईच्या परीक्षा एकाच वेळी होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात चार संधीचा लाभ घेता येणार का याबाबत साशंकता आहे.

सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राज्य मंडळाच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहिर होणार याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. राज्य मंडळाचे परीक्षा अर्ज भरण्यास सध्या सुरूवात झाली असून परीक्षा एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.