देशातील चारचाकी वाहनधारकांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून दिलासा


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने देशातील चारचाकी वाहनधारकांना दिलासा दिला आहे. चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग (FASTag) लावण्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रत्येक चारचाकी वाहनासाठी यापूर्वी 1 जानेवारीपासून FASTag अनिवार्य असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. देशातील टोल नाक्यांवर एक जानेवारीपासून कॅश व्यवहार होणार नाहीत, फक्त FASTag ग्राह्य धरले जाईल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले होते. पण, FASTag साठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रत्येक चारचाकी वाहनाला 15 फेब्रुवारी 2021 पासून FASTag अनिवार्य असणार आहे. FASTag ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नसल्यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील. टोलचे पैसे फास्टॅग अकाउंटमधून वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.