‘त्या’ 120 लोकांची यादी संजय राऊत यांनी ईडीकडे सोपवावी – रामदास आठवले


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आल्यानंतर भाजपवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. भाजपच्या सांगण्यावरून ईडी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच भाजपमधील बेहिशोबी मालमत्ता कमविणाऱ्या 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राऊतांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. भाजपमधील नेत्यांची यादी संजय राऊत यांच्याकडे असल्यास त्यांनी ती त्वरित ईडीकडे द्यावी, असे आवाहन आठवले यांनी दिले आहे.

ईडी भाजपच्या सांगण्यावरून काम करत नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी यावेळी दिले. आरपीआयचा कोकण विभागाचा मेळावा कामोठे येथे घेण्यात आला होता. आठवले यांनी यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महिला, दलितांवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अन्याय होत असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.