मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या विदेश दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. शेतकरी आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरू आहे. त्यातच नुकताच काँग्रेसचा वर्धापन दिनही साजरा झाला. काँग्रेसचा १३६वा स्थापना दिवस देशभरात पक्षाचे कार्यकर्ते साजरा करत असताना आदल्या दिवशीच राहुल गांधी इटलीला निघून गेले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या शो मध्ये या मुद्द्यावरून राहुल यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या कार्यक्रमात राहुल यांचा इटली दौरा आणि शेतकरी आंदोलन या दोन्ही गोष्टींची सांगड घातली, पण त्यांच्याच शोमध्ये त्यांच्यावर गप्प होण्याची वेळ आली.
पंजाब काँग्रेस आणि कर्नाटक सरकार २०१६मध्ये अडचणीत होते. त्यावेळी राहुल गांधी विदेशात निघून गेले होते. आता शेतकरी आंदोलन सुरू आहे. तर ते अशा वेळी युरोपला पळून गेल्याचे अर्णब यांनी विधान केले. अर्णब यांची बोलती त्या विधानावर चर्चेसाठी आलेल्या काँग्रेस प्रवक्त्याने बंद केली. मागील ३७ मिनिटे आपण चर्चा करत आहोत, पण शेतकरी आत्महत्येबाबत तुम्हीच काहीच का बोलत नाही. उद्योगपतींचे उत्पन्न वाढत आहे आणि शेतकरी आणखी गरीब होत आहे यावर तुम्ही गप्प आहात. मिस्टर गोस्वामी उलटसुलट गोष्टी सांगणे आता बंद करा. देशातील जनतेला सत्य सांगा. सध्या कठीण काळात देश आहे. देशवासीयांना अशा काळात एकत्रित आणायला हवे तर तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना दिसत असल्याचे म्हणत अर्णब यांना त्यांनी गप्प केले.
याच कार्यक्रमात, अर्णब यांनी काँग्रेसच्या नेत्यांना मंदबुद्धी म्हटले जाते, असे वक्तव्यही केले होते. काँग्रेस प्रवक्ते त्यावर म्हणाले की सगळ्या लोकांना माहिती आहे की मंदबुद्धी कोण आहे. भाजपची सगळी नेतेमंडळी ही बनावट डिग्रीवाली आहे. या साऱ्या नेत्यांनी देशाची अर्थव्यवस्था नीट मार्गी लावण्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले.