शास्त्री गुरुजींनी केले कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक


मेलबर्न – मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचे पाणी पाजले. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रशिक्षक रवी शास्त्रींनी या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. रहाणे खूप चतूर कर्णधार असून सामन्याचे पारडे कुठे झुकते आहे याचा अंदाज त्याला येतो. माझ्या मते नवोदीत खेळाडूंसाठीही त्याचा शांत स्वभाव फायदेशीर ठरला. उमेश दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही मैदानावर एका प्रकारे आत्मविश्वास दिसत होता. सामना संपल्यानंतर झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत रवी शास्त्री बोलत होते.

शास्त्री यांनी यावेळी बोलत असताना विराट आणि अजिंक्यच्या कर्णधार शैलीतील फरक सांगितला. दोघेही चांगले खेळाडू असून सामन्यात काय घडू शकेल याचा दोघांनाही अंदाज येतो. मैदानात विराट आक्रमक असतो तर अजिंक्य शांत असतो. हा त्यांचा स्वभाव आहे. विराटच्या मनात असते ते लगेच चेहऱ्यावर येते. पण अजिंक्य शांत राहून रणनिती आखतो. त्याला काय साध्य करायचे आहे हे त्याला माहिती असते. म्हणूनच तो शांत राहून नेतृत्व करतो. पहिल्या डावातील त्याचे शतक हा सामन्यातील टर्निंग पॉईंट असल्याचेही शास्त्री म्हणाले.