कोरोनाच्या लसीत वापरण्यात आले गायीचे रक्त; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा


नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस देशामध्ये येण्याआधीच त्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. कोरोना लसीसंदर्भात मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याचा दावा स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे. देशामध्ये गायीचे रक्त असणारी ही लस वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे. यासंदर्भात थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणी यांनी निवेदनही केल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली हे स्पष्टपणे सांगितले जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असे स्वामी चक्रपाणी यांनी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. पण आपला धर्म यासाठी भ्रष्ट करता येणार नाही. कोणतीही कंपनी जेव्हा एखादे औषध बनवते, तेव्हा त्यामध्ये काय वापरण्यात आले आहे याची माहिती देते. मग कोरोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करु दिली जात नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जी लस अमेरिकामध्ये तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याचा दावा स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे.

गायीला सनातन धर्मामध्ये मातेसमान मानण्यात येते. जर आपल्या शरीरामध्ये गायीचे रक्त गेले, तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. अनेक वर्षांपासून सनातन धर्माला संपवण्यासाठी असे कट रचले जात असल्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, असेही स्वामी चक्रपाणी म्हणाले आहेत.

प्रामुख्याने अमेरिकेतील लसीसंदर्भात स्वामी चक्रपाणी यांनी भाष्य केले आहे. गायीचे रक्त वापरण्यात आलेली लस ही अमेरिकेतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी त्यांनी अमेरिकन लसीचा संदर्भ देत भारतामध्ये देण्यात येणाऱ्या लसीबद्दल सर्व माहिती आधी सर्वसामान्यांना देण्यात यावी. ही लस कोणाला देण्यात येणार कोणाला नाही याबद्दलची माहिती द्यावी, असे स्वामी चक्रपाणी म्हणाले आहेत.

पहिल्यांदा विश्वास निर्माण करा मग वापर करा या धोरणाचा आपण अवलंब केला पाहिजे. गायीचे रक्त या लसीमध्ये वापरण्यात आलेले नाही असा विश्वास आधी जनतेमध्ये निर्माण करावा लागेल. त्यानंतर ही लस द्यावी. जीव गेला तरी चालेल पण धर्म भ्रष्ट होता कामा नये. जोपर्यंत कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आलेले नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत अगदी जीव गेला तरी ही लस घेणार नसल्याचे स्वामी चक्रपाणी म्हणाले.

भारतामध्ये कोरोनाच्या लसीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारांमध्ये चर्चा सुरु झाली असून तयारीलाही सुरुवात झाली आहे. भारतामध्ये देण्यात येणारी लस ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.