संजय राऊतांनी पुन्हा एकदा कंगना राणावतला डिवचले


मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत आहे. कंगनाने या प्रकरणावर बोलताना मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवसेना विरुद्ध कंगना असा वादही त्यावरून बघायला मिळाला होता. हा वाद धुसर होत असतानाच कंगनाचा उल्लेख शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंगना असा करत डिवचले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. भाजपने मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून सरकार बनवले. तेजस्वी यादव या तरुणाने बिहारामध्ये आव्हान उभे केले. काश्मीर खोऱ्यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजाबच्या शेतकऱ्य़ांवर जोरजबरदस्तीचे प्रयोग सुरू आहेत. केंद्र सरकार पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी जमिनीवर उतरले. राजकीय अहंकारासाठी मुंबईची ‘मेट्रो’ अडवून ठेवली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली, तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही. २०२० कडे केंद्र सरकारच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून पाहावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

प्रत्येक उगवत्या वर्षाने आशेची किरणे दाखवली, पण निराशेच्या अंधारात ती किरणेही शेवटी गडप झाली. आता नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. मानसिक अस्थिरता, अशांतता यांनी भरलेले २०२० हे वर्ष फार वेगाने संपले आणि मावळत्या वर्षाने काही चांगले पेरून न ठेवल्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष नक्की कसे जाईल, त्याचा भरवसा नाही. लोकांनी स्वतःचे कुटुंब वाचवायचा प्रयत्न करावा. बाकी जग सुरूच राहणार असल्याचे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.