तर शरद पवारांचा ‘जाणता राजा’ नव्हे, विश्वासघात करणारे राजे असा उल्लेख होईल : सदाभाऊ खोत


सांगली – सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रे बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांनी आतातरी खरे बोलावे. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा असा उल्लेख केला जाईल, टीका केली आहे. नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करतानाच सदाभाऊ खोत यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचे खोत म्हणाले.

पवार साहेबांचे काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात. जर त्यांनी म्हटले की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. आपल्या आत्मचरित्रात पवारांनी मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असे म्हटले आहे. पण पवार दुसरीकडे म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावे की न वाचावे असा प्रश्न पडला आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

नव्या कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजावून सांगण्यासाठी देशभरात भाजपच्या वतीने किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. आज सांगलीत या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते.