दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर


पुणे – नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा १८.८१ टक्के निकाल लागला आहे.

१८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामधून या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि एएचसी व्होकेशनल या शाखांतील एकूण ६९५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६९२७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यापैकी १२७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १८.८१ टक्के आहे.

दुसरीकडे १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर कालावधीत दहावाची प्रात्यक्षित परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळांमधून ४४०८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालाची टक्केवारी ३२.६० एवढी आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ एवढी आहे.

विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. गुण पडताळणीसाठी २४ डिसेंबरपासून अर्ज करु शकता.

या लिंकवर सर्व माहिती उपलब्ध आहे –
दहावीसाठी – http://verification.mh-ssc.ac.in/
बारावीसाठी – http://verification.mh-hsc.ac.in