नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या यादीत गुन्हेगारीत नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर


मुंबई : गेल्या काही वर्षांत ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या नागपूर शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर नागपूरला क्राईम सिटी म्हणूनही संबोधले गेले. आता नागपूरने गुन्हेगारीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला असून यासंदर्भातील अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केला आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार नागपूर वर्ष 2019 मध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारची राजधानी पाटणा या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे पाटण्यात 4.7 हत्या झाल्या आहेत, तर नागपुरात दर एक लाख लोकसंख्येमागे 3.6 हत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे महानगर असलेल्या दिल्लीत हे प्रमाण 3.1, जयपूरमध्ये 3.0, लखनौमध्ये 2.6 एवढे आहे.

मुंबई आणि पुण्याचाही या बाबतीत देशातील पहिल्या 20 शहरांमध्ये समावेश आहे. तेराव्या स्थानी पुणे तर मुंबई सतराव्या स्थानावर आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे 1.5 हत्यांची प्रकरणे समोर आली आहे. तर महानगरी मुंबईत हे प्रमाण अवघे 0.9 एवढे आहे. या अहवालावरुन नागपुरातील गुन्हेगारी किती वाढली याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे उपराजधानी नागपूर आता गुन्ह्यांच्या बाबतीत पाटण्यासोबत स्पर्धा करत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे.