पत्नीने तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदार पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस


कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राजकीय लढाईने आता कौटुंबिक लढाईचे रुप घेतले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी प्रवेश केल्यानंतर गृहकलह सुरु झाला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये पत्नी सामील झाल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी सुजाता यांना त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुजाता मंडल यांनी पक्षप्रवेश केला. सुजाता मंडल म्हणाल्या की, कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून आता पुढे काय करायचे आहे याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल. बिश्नुपूर मतदारसंघाचे सौमित्र खान हे खासदार आहेत. त्याचबरोबर ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये पत्नी सामील झाल्याने सौमित्र खान यांचा संताप अनावर झाला आहे. खासदार सौमित्र खान यांनी थेट नाते संपवण्याचे म्हटले आहे. दहा वर्षांचे नाते राजकारणामुळे संपले आहे. सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय सौमित्र खान यांनी घेतला आहे. घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेताना सुजाता खान यांची कार आणि बरजोरामधील घराची सुरक्षा काढून घेतली आहे.

गो तस्करी, कोळसा चोरीच्या आरोपांनंतर सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर पत्नीच्या चोरीचा आरोप केला आहे. तृणमूल संसार मोडत असून आता त्यांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. सोबतच त्यांनी सुजाता यांना नावापुढे ‘खान’ आडनाव न लावता केवळ सुजाता ‘मंडल’ एवढेच लिहावे, असे म्हटले आहे.

दरम्यान सुजाता खान टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर म्हणाल्या की, लोकांचा भाजप सन्मान आणि आदर करत नाही. येथे केवळ संधीसाधू आणि भ्रष्ट लोकांचाच बोलबाला आहे. मला भाजपमध्ये मानसन्मान नव्हता. पक्षासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती, पण आता भाजपमध्ये मला कोणताही मान राहिलेला नाही. पक्षात महिला म्हणून राहणे माझ्यासाठी कठीण बनले होते.

सौमित्र खान यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कोर्ट खटल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात जाण्यासाठी बंदी घातली होती. सुजाता यांनी तेव्हा आपल्या पतीसाठी निवडणुकीचा प्रचार केला होता. सुजाता खान म्हणाल्या की, त्यांना एक दिवस नक्कीच जाणीव होईल आणि काय सांगावे की एक दिवस तेच तृणमुलमध्ये परत येतील. मागील लोकसभा निवडणुकीच्या आधीच सौमित्र खान भाजपमध्ये सामील झाले होते. मुकुल रॉय यांचे ते निकटवर्ती समजले जातात. मुकुल रॉय आधीच भाजपमध्ये सामील झाले होते.