मुंबई – तुर्तास तरी देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी समजा तशी लाट आलीच तर ती खूप गंभीर स्वरूपाची असणार नसल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाच्या छोट्या स्वरूपाच्या लाटा आगामी काही वर्षांत येत राहतील, अशीही शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पण ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी लाट पसरल्यामुळे युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद करण्यात आली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन सूचवले आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटींच्या वर पोहोचला, असला तरी दररोज आढळणारे नवे बाधित व बळींची संख्या कमी होत असून प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक असल्याचे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटल्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण असल्याचे म्हणता येऊ शकते. एवढी रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही. पण कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्याने लोकल, शाळा आणि काही आस्थापने बंदच आहेत.
विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) December 21, 2020
दरम्यान, चीनमधून कोरोना हा जगभर पसरला आहे, विदेशातूनच भारतातही कोरोनाचा प्रसार झाला असल्यामुळे अतिदक्षता घेण्यासाठी आता ब्रिटन ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे., असे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केला असल्यामुळे, भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.