महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा – फडणवीस


मुंबई – आगामी निवडणुका महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष एकत्र लढवतील, अशी चर्चा आहे. पण मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, तशी माझी तर इच्छाच असल्याचे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, भाजपमध्ये आगामी काळात अनेकांचा प्रवेश होणार असून कुणीही भाजप सोडून जाणार नाही. त्याचबरोबर उगाचच काहीजण वावड्या उठवत असल्याचे म्हणत यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधल्याचेही दिसून आले.

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. देवेंद्र फडणवीस या प्रसंगी बोलत होते. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला हा भाजपकडून एकप्रकारे धक्का मानला जात आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी, आगामी निवडणुका महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष एकत्रपणे लढवतील, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मी म्हणेन नक्कीच एकत्र निवडणूक त्यांनी लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण, एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल. परंतु, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोक मावतील? हे देखील एक महत्वाचे असते.

दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणे कठीण जाते, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातील सर्वात मोठी जागा जी आहे ती भाजपासाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि ती जागा व्यापल्या शिवाय भाजप राहणार नाही. म्हणून एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडेतिकडे झाले तरी चिंता करण्याची गरज नाही.

तसेच, भाजपमध्ये आगामी काळात अनेकांचा प्रवेश होणार आहे. पण, उगाचच काहीजण वावड्या उठवत आहेत की, आमच्याकडे भाजपचे आमदार येणार आहे. अशा वावड्या उठण्याचे एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदारांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत.

दुर्देवाने माध्यमांमधीलही काहीजण त्यांनी उठवलेल्या वावड्या पुढे करतात. पण, चिंता करायची गरज नसून भाजपचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, जे भाजपमध्ये विविध पक्षांमधून आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठे राजकारण बघितलेले असल्यामुळे त्यांना हे समजते असल्याचे देखील फडणवीस यांनी बोलून दाखवले.

त्याचबरोबर सर्वांना हे देखील माहिती आहे की या देशाचे भविष्य राहुल गांधी, यूपीए नाही. तर या देशाचे वर्तमान व भविष्य नरेंद्र मोदी आहेत. आमच्या सर्व नेत्यांना याची कल्पना आहे. म्हणून एखादे धोक्याने आलेले सरकार हे किती काळ चालते? कसे चालते? त्याचे पुढे काय होते? या संदर्भातील सर्व माहिती सगळ्यांना आहे. म्हणून पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, भाजप मजबूतच होणार असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.