महाराष्ट्रातील ४ हजार शेतकरी बाईक रॅलीने शेतकरी आंदोलनासाठी गाठणार दिल्ली


नाशिक – महाराष्ट्रातून सुमारे ४ हजार शेतकरी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. या शेतकऱ्यांचा नाशिक ते दिल्ली असा दुचाकी मोर्चा असणार आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली हे सर्व शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या या बाईक रॅलीमध्ये २५० दुचाक्यांचा समावेश असून १,२६६ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना चार दिवस लागणार आहेत. यासाठी त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये ओलांडावी लागणार आहेत. या बाईक रॅलीची घोषणा ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’चे सरचिटणीस अजित नवले यांनी केली होती. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कृषि विधेयकांना विरोध असल्याचे याद्वारे दाखवण्यात येणार आहे. तसेच आमचे ध्येय जोपर्यंत आम्ही साध्य करत नाही, तोपर्यंत परत राज्यात परतणार नाही. दरम्यान, बाईक रॅलीवेळी आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करु आणि पूर्ण काळजी घेऊ, असेही नवले यांनी म्हटले आहे.