27 डिसेंबरला या वर्षीची शेवटची ‘मन की बात’


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे, असे विचारले आहे. त्याचबरोबर लोकांची सरकारकडून येणाऱ्या नव्या वर्षामध्ये काय अपेक्षा आहे याबद्दलही मत मागवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एका ट्विटच्या माध्यमातून अशी विचारणा केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून सरत्या वर्षाकडे पाहता आणि येणाऱ्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत. 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे विचार मागवले आहेत. लोकांनी याबाबत आपला संदेश ‘MyGov’ आणि ‘नमो अॅप’ वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.


आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या’मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतात. 3 ऑक्टोबर 2014 साली या कार्यक्रमाचे पहिले प्रसारण झाले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा ‘मन की बात’ या कार्यक्रमात सामील झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने ओबामांनी 27 जानेवारी 2015 रोजी या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली होती. बराक ओबामा हे 2015 साली भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे होते.