मोहम्मद शमी कसोटी मालिकेबाहेर; भारतीय संघासाठी मोठा झटका


अॅडलॅड : ऑस्ट्रेलिया विरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हात फ्रॅक्चर झाल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत असल्यामुळे त्याला बॅट उचलणेही शक्य नाही.

भारतीय संघासाठी शमीची दुखापत हा मोठा झटका आहे. आता उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीवर भारतीय संघ अवलंबून आहे. दुसरी कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट आणि शमीशिवाय मैदनात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही वापसी होण्याची शक्यता कमी आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान थोपवणे कठीण असणार आहे.