नरेंद्र मोदींकडून पुन्हा एकदा केंद्रीय कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन


रायसेन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना पुन्हा एकदा केंद्रीय कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. एका रात्रीत केंद्रीय कृषी कायदे हे आलेले नाहीत, तर त्यावर गेल्या २० ते २२ वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने व्यापक चर्चा केली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा झाल्याचेही मोदी म्हणाले. यावर गेल्या २०-२२ वर्षांपासून प्रत्येक सरकारने व्यापक चर्चा केली आहे. या कायद्यांवर जवळ-जवळ सर्वच शेतकरी संघटनांनी चर्चा केल्याचेही ते पुढे म्हणाले. एसएसपी बंद करण्याची चर्चा करणे हे सर्वात मोठे असत्य असून एमएसपी बंद होणार नसल्याचे मोदी म्हणाले.

पुढे पंतप्रधान म्हणाले की, सतत कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना, कृषीतज्ज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, कृषी वैज्ञानिक, आमच्याकडील सुधारणावादी शेतकरी करत आहेत. आपल्या ज्या पक्षांनी जाहीरनाम्यांमध्ये कृषी कायद्यात दु्रुस्तीचे वचन दिले होते, शेतकऱ्यांची जे मते घेत आले आहेत आणि ज्यांनी काहीच केले नाही आणि या मागण्या टाळत आले, अशा लोकांकडे खरेतर शेतकऱ्यांनी उत्तर मागितले पाहिजे.

शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. जर आज आपण सर्व राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे पाहिले, त्यांची वक्तव्ये पाहिली, जे लोक पूर्वी देशाची कृषी व्यवस्था सांभाळत होते अशांची पत्रे पाहिली, तर ज्या कृषी सुधारणा आज होत आहेत त्या त्यापेक्षा वेगळ्या नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांना समर्पित आमचे सरकार असून शेतकऱ्यांना आम्ही अन्नदाता मानतो. फायलींच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलेला स्वामीनाथन समितीचा अहवाल आम्ही बाहेर काढला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या, शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट एमएसपी दिल्याचेही मोदी पुढे म्हणाले.