पुढील दोन वर्षात देशातील महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल – गडकरी


नवी दिल्ली – रस्ते वाहतुकीसंदर्भात केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी पुढील दोन वर्षात देशाची टोलनाक्यांपासून मुक्तता होईल, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. देशातील महामार्गांवर पुढील दोन वर्षात कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

अ‍ॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये नितीन गडकरी बोलत होते. यावेळी मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जीपीएस सिस्टमशी सर्व नवी वाहने जोडले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. टोल जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसेच ट्रक चालकांकडून वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केले आहे, याचे मोजमाप करुन आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल. सध्या टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचे किंवा थांबवण्याचे प्रमाण फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे कमी झाल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही रक्कम गतवर्षी २४ हजार कोटी एवढी असल्याचेही त्यांनी सांगितले.