शेतकरी आंदोलनाबाबत नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – दिल्लीच्या वेशीवर मागील २० दिवसांपासून शेतकरी नव्या कृषि कायद्यांविरोधात आंदोलन करत असून शेतकरी कृषि कायदे रद्द करावेत या मागणीवर ठाम आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यादरम्यान आमचे सरकार शेतकऱ्यांना कृषि कायदे योग्य आहेत, हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी जर आपल्याला सांगितले तर शेतकऱ्यांसोबत चर्चा करु असेही म्हटले आहे.

कृषि आणि वाणिज्य मंत्री सध्याच्या घडीला शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. मला जर चर्चा करण्यासाठी सांगितले, तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. जर चर्चाच होत नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेल. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

सरकारने नवे कृषि कायदे आणून शेतकऱ्यांविरोधात काही केले नसल्याचे सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. मी विदर्भातला असून तेथील १० हजार गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्याचे राजकारण करता कामा नये. शेतकरी, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर बदल करण्यास तयार असल्याचे नितीन गडकरींनी स्पष्ट केले आहे.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोनलावरही नितीन गडकरी यांनी भाष्य केले. अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असे मला वाटत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात काही केलेले नाही. आपले धान्य मंडी, व्यापारी किंवा अन्य कुठेही विकणे हा शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.