आंदोलनकर्ते जर शेतकरी नसतील, तर सरकार चर्चा का करत आहे? – पी. चिदंबरम


नवी दिल्ली – आंदोलक शेतकरी केंद्राने लागू केलेली तिन्ही नवीन कृषि विधेयके रद्द करावेत, या मागणीवर ठाम असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून 14 डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केले जात आहे. सामूहिक उपोषण शेतकरी संघटनांचे नेते करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. काही नेत्यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी असल्याचा आरोप केला, तर काहींनी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी असे आरोप करणाऱ्यांना एक प्रश्न विचारला आहे.


कृषि विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी सत्ताधारी मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांचा उल्लेख हे मंत्री हल्ली तर तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत. तुम्ही जर असे आरोप करत असाल तर याचा अर्थ या लाखो-हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. या आंदोलनात जर एकही शेतकरी नाही, तर या आंदोलनकर्त्यांशी सरकार चर्चा का करत असल्याचा कोंडीत पकडणारा प्रश्न पी चिदंबरम यांनी सत्ताधारी नेत्यांना विचारला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पी चिदंबरम यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पदाचा राजीनामा दिला. जाखड यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत.