पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकवणारे श्रीपती खंचनाळे यांचे निधन


कोल्हापूर – महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील मोठे नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. खंचनाळे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती, त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेरीस त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातील खंचनाळे हे होते. पंजाब केसरी बनाता सिंगला १९५९ साली धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरीची गदा पटकावत कोल्हापूरचे नाव उज्वल केले. खंचनाळे यांनी याच वर्षात कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचेही विजेतेपद पटकावले होते. खंचनाळे यांनी १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही पटकावली होती. कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार सुरु असताना क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या उपचारासाठी सरकारकडून ५ लाखांची मदत मिळवून दिली होती.

आपल्या कारकिर्दीत शाहुपुरीत कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या खंचनाळे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरातील शाहुपुरीत पैलवानांच्या अंत्यदर्शनासाठी खंचनाळे यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात येईल.