शुद्राला शुद्र म्हटले तर का वाईट वाटते? ; प्रज्ञा ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – पुन्हा एकदा एका वक्तव्यावरुन भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका कार्यक्रमात बोलताना वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटले तर वाईट वाटत नाही. पण, एखाद्या शुद्राला शुद्र म्हटले, तर त्याला वाईट वाटते. यामागे नेमके काय कारण आहे, समजत नसल्याचा प्रश्न प्रज्ञा ठाकूर यांनी केला. पण आता त्यांच्या या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. खासदार ठाकूर कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, क्षत्रियाला क्षत्रिय म्हटले, तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटले, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटले की, वाईट वाटते. यामागे नेमके काय कारण आहे? तर समजू शकत नसल्याचे वक्तव्य विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या घटनेवरून खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार असून आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या असल्याची टीका ठाकूर यांनी केली.