विजय माल्ल्या झाला भिकारी, वकिलाला द्यायलाही त्याच्याकडे नाहीत पैसे


नवी दिल्ली – भारतीय बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला लिकर किंग आणि कर्जबुडव्या विजय माल्ल्या भिकारी झाला असून सध्या त्याच्याकडे वकिलालाही देण्यासाठीही पैसे उरलेले नसल्याचा एक तातडीचा अर्ज शुक्रवारी विजय माल्ल्याने ब्रिटनच्या न्यायालयात दाखल केला आहे. त्याने ज्या अर्जात त्याचे बँक अकाऊंट हाताळण्याची संमती मागितली आहे. त्याचबरोबर फ्रान्समधील संपत्ती विकल्यानंतर जे पैसे आले आहेत, त्यातील १४ कोटी रुपये देण्यात यावेत, असेही विजय माल्ल्याने म्हटले आहे.

सध्या विजय माल्ल्याची बँक खाती गोठवण्यात आली असून ही बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत, असेही त्याने अर्जात म्हटले आहे. जो खटला कर्ज घोटाळा केल्याचा सुरु आहे त्याची फी भरण्यासाठी आपल्याला पैसे हवे असल्याचेही विजय माल्ल्याने या अर्जात म्हटले आहे. वेळेत फी दिली नाही तर आपण खटला लढणार नसल्याचे विजय माल्ल्याच्या वकिलाने त्याला सांगितले असल्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत. भारतातील एसबीआयसह प्रमुख बँकांचे ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून विजय माल्ल्या फऱार झाला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.

लंडनच्या उच्च न्यायालयात आर्थिक चणचण भासत असल्याने कोंडीत सापडलेल्या विजय माल्ल्याने अर्ज दाखल केला आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी १४ कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती या अर्जाद्वारे विजय माल्ल्याने केली आहे.. माल्ल्याची सर्व संपत्ती लंडनमधील न्यायालयाच्या निगराणीखाली आहे. न्यायालयात खटला सुरु असेपर्यंत माल्ल्याला ही संपत्ती विकता येणार नाही. तसेच ही संपत्ती तारण ठेवून कुणाकडून कर्जही घेता येणार नाही.