कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द


जेजुरी : जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. जेजुरी गडावरुन सोमवती यात्रेच्या दिवशी उत्सवमुर्ती पालखीतून कऱ्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. तसेच सोन्याच्या जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त जमावबंदी लागू करण्यात आल्यामुळे एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.

जेजुरीत 13 ते 14 तारखेदरम्यान येऊ नका, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 12 ते 14 डिसेंबरपर्यंत, म्हणजेच शनिवार ते सोमवार तीन दिवसांसाठी भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग या तीन दिवसात बंद करण्यात येणार असून खंडोबा गडावर मंगळवार नंतर पुन्हा भाविक जाऊ शकतील, अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

कोरोनामुळे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. जेजुरीत सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार, कलम 144 नुसार जेजुरीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी 12 ते 14 डिसेंबर दरम्यान, जेजुरीत येऊ नये, सोमवती यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे आवाहन मार्तंड देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनीही केले आहे.

मंगळवारी चंपाषष्टी उत्सव खंडोबा गडावर सुरु होणार आहे. ग्रामस्थ आणि भाविकांना या पाच दिवसांच्या काळात नेहमीप्रमाणे मुखदर्शनची सोय करण्यात आली असून प्रथेप्रमाणे पूजाविधी पार पडणार आहेत. तसेच दर्शन मंडपामध्ये पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.