घरात घुसून रावसाहेब दानवेंना मारायला हवे ; बच्चू कडू संतापले


मुंबई – शेतकरी आंदोलनाबाबत भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल, असा संताप व्यक्त केला आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दावा केल्यानंतर चहूबाजूंनी दानवेंवर टीका होत आहे. आज औरंगाबादमध्ये शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन सुरू आहे. तर दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर संताप व्यक्त केला.

रावसाहेब दानवे यांनी मागच्या वेळीस देखील अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता असे वाटते की आम्हाला त्यांना घरात घुसून मारावेच लागेल, असे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील समाचार घेतला. शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर संरक्षण मंत्र्यांनी तातडीने पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.