विरोधासाठी विरोध दर्शवायचा ही शिवसेनेची भूमिका – निलेश राणे


रत्नागिरी – शेतीचे शिवसेनेला ज्ञान आहे का? शिवसेनेचा शेती हा विषय नसून तेवढी अक्कलही शिवसेनेला नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणूनच शेतकरी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याची टीका माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि विधेयकांच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे. देशभरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळतो असून निलेश राणे यांनी या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत बोलत असताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

प्रचंड गोंधळलेला शिवसेना हा पक्ष असून सध्या या पक्षाचा उतरता काळ सुरू झाला असल्यामुळे त्यांची पतही घसरु लागली आहे. शिवसेनेला दिल्लीतही कुणी किंमत देत नाही. शिवसेना अलीकडच्या काळात कोणत्या एका भूमिकेवर ठाम राहिल्याचे दिसून आलेले नाही. ते सध्या रोज खोटे बोलतात, त्यांची दखल घेणे एक दिवस महाराष्ट्राची जनताच बंद करेल. त्यानंतर शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्येच कृषि कायद्यांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या कायद्यांना ते का विरोध करत आहेत, ते अनाकलनीय आहे. कायदा पंतप्रधान नरेंध्र मोदी यांनी आणला म्हणून या कायद्याला विरोध दर्शवला जातो आहे. कृषि विधेयकातील तीव्रता फक्त पंजाबमध्ये जास्त आहे. अशी परिस्थिती इतर कोणत्याही राज्यात नसल्याचेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.