अखेरच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव, पण मालिका जिंकली


सिडनी – अखेरच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा १२ धावांनी पराभव झाला असून ऑस्ट्रलियाने दिलेल्या १८७ धावांचे दिलेले आव्हान टीम इंडियाला पार करता आले नाही. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ८४ धावा केल्या. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.

भारतीय संघाची सुरुवात १८७ धावसंख्येचा पाठलाग करताना खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असे वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडले. यानंतर संजू सॅमसननेही तिसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ करत आपली विकेट फेकली.

दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसन माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. विराटने डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. पण कर्णधार फिंचने फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केले आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवले.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर १८६ धावांचा डोंगर उभा केला आहे. या मालिकेत भारताने बाजी मारली असली तरीही व्हाईटवॉशसाठी भारताला १८७ धावांचे आव्हान पूर्ण होते. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या टी-२० त अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावला. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले, स्मिथने २४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने मॅथ्यू वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.